आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या, रिकामी झालेली मनपाची तिजोरी भरण्यासाठी महापौर घोडेलेंचा मालमत्ता कर वसुलीवर भर

Foto

औरंगाबाद – नंदकुमार घोडेले यांचा महापौरपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला. पाणी, कचरा प्रश्न जैसे थे आहे. त्यातच महानगर पालिकेच्या तिजोरीतही ठणठणाट आहे. मनपाचा खर्च वाढलेला आहे आणि  त्या तुलनेत उत्पन्न फार कमी आहे. विकासकामांसाठी खर्चाचा ताळमेळ साधताना पदाधिकारी आणि अधिकाराऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी दिवाळीनंतर महापालिका प्रशासन मालमत्ता कर वसुलीवर भर देणार आहे. पन्नास कोटींची कर वसुली करण्याचे मनपाचे लक्ष्य असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

 

नोव्हेंबरमध्ये विशेष वसुली सप्ताह

महापालिकेच्या वतीने १२ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष वसुली सप्ताह राबवला जाणार आहे. मनपाच्या ९  प्रभागांमध्ये हे वसुली अभियान चालणार आहे.

मालमत्ता कराची मार्च २०१९ पर्यंतची एक रकमी थकबाकी भरणऱ्या मालमत्ता धारकांना शास्ती आणि विलंब शुल्कामध्ये ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

घर तिथे करअंतर्गत मालमत्ता कर न लावलेल्या मालमत्तांना नवीन कर आकारणी करणे, वादग्रस्त प्रकरणात तत्काळ निर्णय घेऊन कर वसुली केली जाणार आहे.

 

कोट्यवधींची थकबाकी

शहरातील खासगी संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था यांच्याकडे मालमत्ता कराची कोट्यवधींची थकबाकी आहे. हा कर वसूल करण्यासाठी मनपा आता विशेष मोहिम राबविणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

 

५० कोटींचे लक्ष

शहरातील विकास कामांना  अधिक गतिमान करण्यासाठी तब्बल ५० कोटींचे लक्ष ठेवत महापौरांना उशिरा का होईना जाग आल्याची चर्चा महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांमधे रंगली आहे. 

 

शहरातही मालमत्ता धारकांकडून तब्बल पन्नास कोटींचे वसुली उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी कर भरणाऱ्या नागरिकांना सूट देणार असल्याचे महापौर घोडेले यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका ही नागरिकांची संस्था आहे. ती जर चालवायची असेल तर नागरिकांच्या सहभागानेच चालविता येईल असे म्हणत महापौर घोडेले सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना म्हणाले की, नागरिकांच्या सहभागाने महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता एक सप्ताह  राबविण्यात येणार आहे. दंडामध्ये नागरिकांना सूट दिल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये अनधिकृत नळधारकांना दंड भरून आपले नळ अधिकृत करता येणार आहे. आपली बांधकामेही या सप्ताहामध्ये नियमित करता येणार आहेत. नागरिकांना ही खूप मोठी संधी आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मालमत्ता वसुली करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.